नमस्कार दोस्तांनो,

चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.

तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...

पुन्हा भेटूच ...

मंगळवार, ७ जुलै, २०२०

'मधुशाला' - हरिवंशराय बच्चन

कविता आवडणाऱ्या प्रत्येकाच्या संग्रही असावं असं हे एक अफलातून पुस्तक. या पुस्तकाद्वारे हरिवंशराय बच्चन यांनी फार मायेने, आणि अत्यंत विश्वासाने त्यांच्या प्रिय मधुशालेला वाचकांच्या हवाली केलं.

वयाच्या २७-२८ व्या वर्षी हरिवंशराय बच्चन यांनी 'मधुशाला' लिहिली. नावाप्रमाणे मधुशाला मदिरा, मदिराक्षी नि मदिरालय या गोष्टींभोवती या कवितेची कडवी फिरतात. अशी जवळपास १४० च्या आसपास कडवी त्यांनी लिहिली. आणि यातल्या प्रत्येक कडव्याचा शेवट मधुशाला ने होतो. १९३३ साली काशी विश्व हिंदू विद्यालयात एका कविता संमेलनात बच्चनजींनी मधुशाला सादर केली. एकतर कवितेचा अंगभूत ठेका आणि तरुणाईला आवडणारा विषय त्यामुळे मधुशाला फार थोड्या दिवसांत लोकप्रिय झाली.  महाविद्यायीन तरुणांना मधुशालाची कडवी तोंडपाठ झाली,  मधुशाला आवडीने कट्ट्यावर गुणगुणू जाऊ लागली. कविता संमेलनासारख्या साहित्य या विषयाला वाहिलेल्या कार्यक्रमात चक्क महाविद्यालयीन तरुण गर्दी करू लागले, आणि बच्चनजींना मधुशाला सादर करण्याच्या फर्माईशी येऊ लागल्या. एकूणच मधुशाला ने आगमनापासून धमाल उडवली होती. बच्चन नावाचं वलय जंजीर पासून सुरु झालं असं आपण आपलं म्हणतो, पण वलयाची खरी सुरुवात १९३३ पासूनचीच.

वर म्हटल्याप्रमाणे मदिरालय हा एकच धागा घेऊन एखादा कलाकार त्यात काय काय विचार गुंफू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे मधुशाला.  पुष्पमाला म्हणून ती नितांत सुंदर आहेच, पण यातल्या प्रत्येक फुलानेही आपलं वेगळं सौंदर्य आणि मनमोहक गंध उराशी आजही जपला आहे. उदाहरण द्यायचं झालं तर काही ठिकाणी बच्चनजी धर्मभेद, जातिभेद यांवर भाष्य करतात, साम्यवादाचा पुरस्कार करतात, जसं ही कडवी पहा

मुसलमान औ' हिन्दू हैं दो,
एक, मगर, उनका प्याला,
एक, मगर, उनका मदिरालय
एक, मगर, उनकी हाला;

दोनों रहते एक न जब तक
मस्जिद - मन्दिर में जाते;
वैर कराते मस्जिद - मन्दिर
मेल कराती मधुशाला !

कभी नहीं सुन पड़ता, 'इसने,
हा, छू दी मेरी हाला',
कभी न कोई कहता, 'उसने
जूठा कर डाला प्याला;

सभी जाति के लोग यहाँ पर
साथ बैठकर पीते है;
सौ सुधारकों का करती हैं;
काम अकेली मधुशाला |

साम्यवादाबद्दल मत मांडताना म्हणतात,

रंक-राव में भेद हुआ है
कभी नहीं मदिरालय में,
साम्यवाद की प्रथम प्रचारक
है यह मेरी मधुशाला |

तर कधी आयुष्याचा शेवट कसा असावा यावर ते विनोदबुद्धीने भाष्य करतात.

मेरे शव पर वह रोए, हो
जिसके आँसू में हाला,
आह भरे वह, जो हो सुरभित
मदिरा पीकर मतवाला

दें मुझकों वे कंधा जिनके
पद मद - डगमग होते हों,
और जलूं, उस ठौर, जहाँ पर
कभी रही हो मधुशाला

तर पुढच्याच कडव्यात श्राद्धाबद्दल लिहितात,

प्राणप्रिये यदी श्राद्ध करो तुम,
मेरा, तो ऐसा करना
पीनेवालों को बुलवाकर,
खुलवा देना मधुशाला

असे नानाविध विषय त्यांनी कल्पकतेने या मधुशालेत मांडलेत. एवढं सगळं लिहिणारा म्हणजे अट्टल दारुडा असणार याची आपल्याला खात्री होते, बच्चनजींना अशा बऱ्याच शंका विचारून विद्यार्थ्यांनी भंडावून सोडलं, पण बच्चनजी दारूला स्पर्श करत नसत. त्यांनी दारूचा पुरस्कारही केला नाही. काहीजण केवळ दारू या विषयी गमतीशीर वाचायला मिळेल म्हणून या प्याल्यावर घोंघवतात, मात्र फक्त मोजके रसिक या प्याल्यातल्या अर्थाच्या अर्कापर्यंत खोल शिरू शकतात. म्हणून बच्चनजी म्हणतात,

जितनी दिल की गहराई हो,
उतना गहरा है प्याला;
जितनी मन की मादकता हो,
उतनी मादक है हाला;

जितनी उर की भावुकता हो
उतना सुन्दर साक़ी है,
जितना ही जो रसिक, उसे है
उतनी रसमय मधुशाला

मधुशाला बद्दल प्रत्येकाची वेगवेगळी मतं असण्याचा निश्चित संभव आहे. पण एक गोष्ट तितकीच खरी १९३३ साली लिहिलेल्या या मधुशालेची आजच्या वाचकांवरही नशा कायम आहे. म्हणतात ना वाईन जुनी झाली की अधिक चवदार होते तसं काहीसं. आयुष्यात एकदा तरी तोंडी लावावा असा हा अस्सल रसरसता प्याला रसिकांनी जरुर चाखावा.

- प्रसाद साळुंखे

२ टिप्पण्या: