नमस्कार दोस्तांनो,

चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.

तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...

पुन्हा भेटूच ...

बुधवार, ७ डिसेंबर, २०२२

नदीष्ट - मनोज बोरगावकर

या नद्या काही माझी पाठ सोडत नाहीत आणि ' गोदावरी ' तर नाहीच नाही. हा सिलसिला सुरू झाला गावी नदीत पाय मुरगळण्यापासून, तेव्हा नदीला लाखोल्या वाहिल्या नसल्या तरी थोडासा खट्टू मात्र झालो होतोच. त्यानंतर काही दिवसांनी ' गोदावरी ' नावाचा नदीवर बेतलेला नितांत सुंदर सिनेमा पाहिला. त्यानंतर नर्मदामाईचा  उल्लेख असलेलं थोडं वेगळ्या धाटणीचं ' तत्वमसी ' वाचलं. आणि आता तर हे पुस्तक खंगाळून सारे रुसवेफुगवे विस्मरून पुरता ' नदीष्ट ' झालोय.

बरेच दिवसांपासून खरं तर मनोज बोरगावकरांचं हे प्रसिद्ध पुस्तक वाचायचं मनात होतं. पण योग येत नव्हता. पुस्तक फारच अप्रतिम आहे. मूळात हा विषयच वेगळा आहे. निसर्गाशी एकरूप झालेला माणूसच हे भावबंधांचं नाजूक शिवधनुष्य अलवार पेलू शकतो. नदीचा हा घाट पायरी पायरीने उतरतांनाही वाटेत पडलेला आस्थांचा, संवेदनांचा प्राजक्तसडा पायदळी येऊ नये याचं भान लेखकाने मनोभावे जपलं आहे. 

लेखकाला नदीवर पोहायचा नाद असते. जवळपास दहा वर्षे लेखक गोदावरीच्या तीरावर नित्यनेमाने पोहत असतो. नदीत पोहत असताना त्याला आईसोबत असल्यासारखं वाटतं. नदीत निवांतपण शोधणाऱ्याला भावनेच्या ओलाव्याची जाण निश्चितच असणार. याच जाणिवेने ओतप्रोत भरलेलं हे लिखाण आहे.

पुस्तकाची मांडणीही सुरेख आहे. प्रवाही लिखाण आहे, त्याला विशिष्ट ताल आहे वेग आहे, त्यामुळे पुस्तक खाली ठेववत नाही. भावनेचा हा काठ धरून गोदातीरी मानवी नातेसंबंधांची जी दिंडी निघालीय तिचं रूप केवळ अवर्णनीय. पुस्तक वाचतांना जसजशी दिंडी पाऊल दर पाऊल पुढे सरकत जाते तसतसं दिंडीत पुढे कोण सामील होईल ही उत्सुकता बळावते, आणि त्याचवेळी दिंडीत मागे काय उरणार हे गूढही आपल्याला अस्वस्थ करतं.

लेखक नदीतले आणि तिच्या आसपासचे बदल फार प्रभावीपणे मांडतो. नदी वाहती असल्यामुळे नव्या पाण्याची नित्यनवी नवलाई घेऊन नदी रोज नव्याने लेखकाला भेटते, त्याचप्रमाणे लेखकही त्या नव्या पाण्याचा, अनुभवांचा मुलामा लेवून एक नवी जाण, एक नवं भान, नवी समज घेऊन नदीवरून परततो.   

नदीशी जोडली नाळ जपता जपता नदीकाठी असणाऱ्या माणसांशीही लेखक बंध निर्माण करतो. पुस्तकात एके ठिकाणी लेखक नदीच्या निर्जन तळावरची वाळू काढायचा प्रयत्न करतो, अशा या अवलियाने दुखावलेल्या मानवी मनाचा तळ न गाठला तर नवलच.  विशेष म्हणजे हे नदीकाठी निरनिराळ्या कारणाने जमणारे लोकही लेखकासमोर आपलं अतर्मन मोकळं करतात. या गोतावळ्यात गुराखी, पट्टीचे पोहणारे वयस्क मित्र, देवळाचा पुजारी,मसणजोगे, मच्छीमार, सर्पमित्र, भिकारी, तृतीयपंथी या शिवाय माकडं, हरणं, रानमांजर, म्हशी, मोर, वरडोळी मासे असे बरेच जण सामील असतात. 

नदीची वाळू उपसणाऱ्यांबद्दल बोलताना नदीच्या गर्भाला ते इजा करत आहेत असं लेखक म्हणतो तेव्हा आपण आतून ढवळून निघतो. या वाळूमुळे ठराविक अंतर वाहिल्यानंतर नदी आपसूक शुद्ध होते, कदाचित म्हणूनच समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातले लोक त्यांच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर आपल्या विचारांची जळमटं, नि दुनियादारीचा पाचोळा घेऊन नदीकाठी निवांतपणा शोधण्यासाठी येत असतील का? 

लेखक अक्षरशः नदी जगलाय. नदीपासून त्याला वेगळा काढणं शक्य नाही एवढा समरसून जगलाय. नदीची विविध रूपं लेखकाने अनुभवली आहेत. नदीसोबतच नदीचा सभोवतालही पाहिलाय. काठावरच्या प्राण्यांच्या गमती कधी विक्षिप्त वागणं त्याने अनुभवलं आहे. काठावर भरल्या नदीसारखी भावनांनी काठोकाठ भरलेली माणसं त्यानी पाहिलीत. त्यांचं हिंदकळणंही लेखकाने तितक्याच हळवेपणाने टिपून घेतलं आहे.

हे पुस्तक म्हणजे लेखकाच्या नदीवरच्या अनुभवाचा संवेदनशील घोटीव अर्कच म्हणावा लागेल. इतरांप्रमाणे  नदीत वरचेवर भक्तिभावाने लेखक बंदा रुपया टाकत नसेलही, पण ही जितीजागती ओलीहळवी नदी आपल्या स्वाधीन करून आपलं अस्सल नाणं मात्र लेखकाने खणखणीत वाजवलं आहे. 

खरोखरीच लेखक म्हणतो त्याप्रमाणे 'she is living organism',  म्हणून तर पुस्तक मिटलं तरी गोदेचं हुंकारत खळाळणं कितीतरी वेळ आपल्याला स्पष्ट ऐकू येतं. 

- प्रसाद साळुंखे 

शनिवार, ३ डिसेंबर, २०२२

त्या पूलावर

'त्या पूलावर ...'

ती आली होती,
डोळ्यात वादळ घेऊन,
मात्र होती निश्चल.
फिक्या चेहऱ्यावर होतं,
निश्चयी लालगडद लिपस्टिक.
विचारांचा पारवा घुमत होता,
तिच्यात भरलेल्या रीतेपणात,
तिथल्या कासावीस शांततेत.
मौनाच्या पूलावर उगाच रेंगाळलो,
मागेपुढे ..
अंदाज घेत ...
पण पावलं रेटली नाहीत,
तिच्या अवकाशापर्यंत.
राहू दे निदान हा पूल शाबूत,
तिच्यापर्यंत पोहोचण्याच्या शक्यतेचा.
उसवलं होतं काहीतरी आत,
माझ्या कोषानी सांधता न येणारं असं.
धग जाणवत होती,
श्वासाचे विस्तव धुमसण्याची,
ती निर्धोक होती तिथे,
तरी,
डोळ्यांचे पहारेकरी होते,
माझ्या हालचाली टिपत.
का वाटत होतं तिला?
मी सांगावा हक्क,
तिच्या बेनामी जखमांवर.
क्षितिजं ओसंडायच्या बेतात असतांना,
चलबिचल मनस्थितीत उठलो,
कॉफीचा वाफाळता कप,
ठेवला समोर निवण्यासाठी.
विषयांतर म्हणून रीचवलेही,
तिने कडूगोड घोट.
विषय नेमका नव्हता माहित,
पण प्रसंगाला संयमी बगल दिली,
नेहमीप्रमाणे.
सावरू दिलं तिचंच तिला.
कधीतरी मग,
तंद्रीतून बाहेर येत,
'येते मी' एवढंच म्हणाली.
मीही मान डोलावली.
कोणास ठावूक का,
जाता जाता,
मान वळवून,
फुललेल्या चाफ्यासारखं हसली.
जणू संपली परीक्षा,
सापडली निरुत्तरीत उत्तरं.
अतासा तो चाफा दरवळतो,
आठवणींच्या निर्माल्यात.
म्हणून टाळतो हल्ली कॉफी,
का रेंगाळणं त्या पूलावर,
जो पोहोचत नाही कुठेच ...

- प्रसाद साळुंखे

बुधवार, २३ नोव्हेंबर, २०२२

तत्वमसि - ध्रुव भट्ट

तत्वमसि 
मूळ गुजराथी कादंबरी लेखन - ध्रुव भट्ट
मराठी अनुवाद - अंजनी नरवणे

' तत्वमसि ' उपनिषदातलं खूप गहन अर्थ असलेलं, वरकरणी एक शब्द पण वास्तवात एक महावाक्य. नावापासूनच वेगळेपण जपणाऱ्या ध्रुव भट्ट लिखित या मूळ गुजराथी पुस्तकाचा अंजनी नरवणे यांनी फार उत्तम मराठी अनुवाद केला आहे. भारतीय संस्कृतीत नेमक्या कुठल्या धाग्याने विविध धर्माचे , पंथाचे, जातीचे, स्तरातले लोक बांधले गेले आहेत यावर सर्वांगाने विचार करायला हे पुस्तक भाग पाडतं. अध्यात्मिक विचार करायला लावणारं पुस्तक असूनही हे बोजड प्रवचनाने, वा चमत्काराने भारलेलं नाही. 

' सारं थोतांड आहे ' असा असंवेदनशील उद्धट पुरोगामी सूर नाही, वा असं मत मांडणाऱ्याना खोडून काढलं आहे असंही नाही. संस्कृतीचा प्रवाह काठावर बसून अभ्यासून त्यावर आपल्या बौद्धिक वकुबानुसार उथळ वरवरची मतं प्रदर्शित करण्यापेक्षा, त्या प्रवाहात उतरून तिची गुपितं जाणून घ्यायचा हा फार सुंदर प्रवास आहे.

यातला कथानायक हा परदेशातून 'मानव संसाधन विकास' या विषयावर काम करायला आदिवासी पाड्यात राहतो. आपली मतं घेऊन आलेला तो, आणि निसर्गाच्या सहवासात, अस्सल मातीतल्या रानावनात वाढलेल्या माणसांच्या सानिध्यात राहून हळूहळू बदलत चाललेला कथानायक हा फार भावतो. हा परदेशातून आलेला वगैरे उल्लेख केला म्हणून सरळसोट ' स्वदेश ' वगैरे सारखं थोडं फिल्मी कथानक आहे असा गैरसमज होऊ शकतो, पण पुस्तक जरा वेगळं आहे. चोखंदळ वाचकांना वाचायला आवडेल असं आहे. अडाणी मागासलेले समजल्या जाणाऱ्या आदिवासींना शिकवण्यासाठी शाळा जशी गरजेची आहे, तसंच त्यांचीही कौशल्य, समज, मेहनत, निसर्गाचा आदर, प्रामाणिकपणा, जगण्यातली सचोटी पुढारलेल्या समजणाऱ्या आपणही आत्मसाद करणं गरजेचं आहे, कारण त्यांना कदाचित या देशाला भारत म्हणतात हे माहीत नसेल, पण भारतीय संस्कृती तेही टिकवतात कदाचित आपल्यापेक्षा जास्त प्रमाणात टिकवतात. 

संस्कृती म्हटलं तर नद्यांना वगळून कसं चालेल. भारतीय संस्कृतीचा प्रवाह जणू नदीच्या प्रवाहापासून वेगळा होतच नाही. उत्तर आणि दक्षिण या दोन भागांत नर्मदा नदी आपल्या देशाला विभागते, वा लेखक म्हणतो त्याप्रमाणे वेगळा विचार करायला झाल्यास या दोन भागांना ही नदी बांधून ठेवते. एवढी माणसं , अनेक जीवजंतू, प्राणिमात्र, इतिहास , अनेकानेक स्थित्यंतरं जपणारी ही नदी निर्जीव तरी कशी म्हणावी. मूळात पाणी म्हणजे जीवन, आणि या जीवनाचा स्त्रोत म्हणजे आईच की. 

ही नर्मदा लेखकाला नानाविध रुपात प्रवासात, जंगलातल्या वास्तव्यात भेटते, आणि आकर्षित करते. नर्मदा परिक्रमा करणाऱ्या भाविकांची सुरुवातीला निरिच्छेने का होईना पण सेवा करायची संधी नायकाला गवसते, आणि या परिक्रमेतलं साहस, गूढ याने कथानायक अचंबित होतो. पृथ्वीवर नदीवर श्रद्धा असणारं दुसरं कुठलं उदाहरण त्याला आठवत नाही. 

वाजपेयीजी म्हणतात त्याप्रमाणे ,

'यह चन्दन की भूमि है, अभिनन्दन की भूमि है,
यह तर्पण की भूमि है, यह अर्पण की भूमि है।
इसका कंकर-कंकर शंकर है,
इसका बिन्दु-बिन्दु गंगाजल है।'

भारतीय संस्कृतीचा हा सामान्यातल्या सामान्य माणसात आढळणारा सर्वसमभाव, नर्मदेची निर्मळता, कडेकपारींची स्थितप्रज्ञता, सूर्याचं तेज, चांदण्याची शीतलता, झाडांपेडांची परोपकारी वृत्ती या साऱ्याचं सार असलेली आणि आपल्या खूप आत रुजलेली ही संस्कृती लेखक छोट्या छोट्या उदाहरणांनी खूप सुंदररित्या अगदी सहजतेने समजावून सांगतो.

यातल्या कथेतल्या कथानायकाचं 'मानवी संसाधन विकास ' या विषयावर लिहायचं काम संपतं, की भारत भेटीने काम संपलं वाटत असताना स्वत:तलं ब्रम्ह गवसून त्याच्या आयुष्याची नवी सुरुवात होते, हे जाणण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा. 
 

-प्रसाद साळुंखे

शनिवार, २७ ऑगस्ट, २०२२

आजही अशी कशी

हूरहूर भासते आजही अशी कशी!
अजूनही चांदवा,
पोचतो अंगणी,
अंगणात चांदवा,
काळजात चांदणी.
लुकलुक डोळीयांत आजही अशी कशी,
हूरहूर भासते आजही अशी कशी !

पावले ओलावली,
भरती उधाणली,
उधाणली ओल ही,
पावलात सांडली.
हूळहूळ पावलांत आजही अशी कशी,
हूरहूर भासते आजही अशी कशी!

ओढता दार ती,
पळभर थांबली,
थांबल्या दारास मी,
चंद्रकोर टांगली,
सुनसून चांदरात आजही अशी कशी,
हूरहूर भासते आजही अशी कशी!

खुळावतो मेघही,
धरतीची आसही,
आसावल्या मेघाची,
तुझ्या मनी गाजही,
छुनछुन नादते आजही अशी कशी,
हूरहूर भासते आजही अशी कशी!

तशीच तू,
तसाच मी,
माझ्यात तू,
नाही तशी,
कुजबूज अंतरी आजही अशी कशी,
हूरहूर भासते आजही अशी कशी!

- प्रसाद साळुंखे

रविवार, २१ ऑगस्ट, २०२२

कलाकाराची एक्झीट

हे जग हा रंगमंच आहे
रंगमंचच
प्रत्येकाची आपली संहिता
प्रत्येकाच्या भूमिका वाटून दिलेल्या
प्रत्येकाच्या संहितेत प्रत्येकाची भूमिका वेगळीच
चेहरे रंगतात
चेहरे मुखवटे धारण करतात
चेहरे खरे वाटतात
खऱ्यापेक्षा बरे वाटतात
एंट्री आणि एक्झीट ठरलेली
याच्यामध्ये नेमकं काय घडतं त्यावर सगळा खेळ
एंट्रीच्या भितीवर दामटून बसलेली बेभानी
संहितेच्या पानांना संवेदना द्यायचं भान
चेहऱ्यावर पडलेला प्रसिद्धीचा क्षणभंगुर झोत
अंधारासमोर स्वप्नांनी चोपलेलं निशब्द शब्दाचं स्वगत
सारं आठवतं एक्झीट झाल्यावर
टॅक्सी करू म्हणता म्हणता
हॉल्सच्या गोळीचा रस गिळत बसची वाट पाहत बसायचं
खिशातल्या नाईटचे पैसे पूर्ण शाबूत रहावेत म्हणून
त्यांच्यासाठी
ज्यांना वाटतं
तो काय कलाकार माणूस 
मजा मारत असतो नेहमी

- प्रसाद साळुंखे

गुरुवार, ११ ऑगस्ट, २०२२

याला काय म्हणावे?

ती समोरून येताना
धडधड धडधड व्हावे
मनमोराने 
मनमुराद
थुईथुईसे नाचावे
कुणीतरी गोमट्या
भामट्याने
करावी थोडी लगट
तीनंही लगेच द्यावी साथ
स्वतःशीच हसत
मग काय?
उपटसुंभाने मनमोरास पुरते भादरावे
याला काय म्हणावे?

ट्रेन रिकामी दिसता 
आम्ही घ्यावे जरा शिरून
स्वतःलाच देत दाद
बसावे पसरून
वातावरण हवेशीर
फर्स्ट क्लास व्हावे
निवांतपणाचे जरा उरात दोन श्वास भरावे
ब्यागेतून
सहजसोपे पाडगांवकर निघावे
मग काय?
कारण नसता ट्रेनने उलटे यार्डाकडे सुटावे
याला काय म्हणावे?

पाकीट असता अशक्त
दिसावी सेलची पाटी
सगळे ब्र्यांडेड कपडे 
अन् अनब्र्यांडेड माणसांची दाटी
हवाहवासा नग मिळायला 
सोफेस्टिक झटापटी
साईज आणि किमतीच्या सांभाळत खटपटी
आपणही आठशेचे शर्ट चारशेत पटकवावे
मग काय?
सहाशेच्या छत्रीस रिक्षेत सपशेल विसरून यावे
याला काय म्हणावे?

देवळातल्या देवाशी मग बोलावे थोडे
आमच्याच बाबतीत असे का 
हे नेहमीचेच कोडे
देवाने तक्रारी ऐकून खो खो हसावे
हसताना मुखकमल मोठे प्रसन्नसे भासावे
चालायचेच म्हणत सारे आपणही मग विसरावे
मग काय?
नेमके माझेच चप्पल देवळासमोरून गायब व्हावे
याला काय म्हणावे?

- प्रसाद साळुंखे

सोमवार, १८ जुलै, २०२२

तू जुनी जुनीशी

तू 
जुनी जुनीशी
आठवू लागलो
नवी नवी
जशी
छबी तुझी
भासवू लागलो

गार वारा
पान माझे
पावसाळी
भान माझे
रंग ओलेकंच
चेतवू लागलो
नवी नवी 
जशी 
छबी तुझी
भासवू लागलो

तो किनारा
लोटलेला
रोखलेला
श्वास माझा
घाव हे मखमली
कातरू लागलो
नवी नवी
जशी
छबी तुझी 
भासवू लागलो

थेंब पाचू
या सरीचा
वाजे वेणू
अंतरीचा
हवीहवीशी स्पंदने
थोपवू लागलो
नवी नवी
जशी
छबी तुझी 
भासवू लागलो

मेघ काळा
व्यापलेला
ताणलेला
वेडचाळा
गुंतूनी गुंतणे
सोडवू लागलो
नवी नवी
जशी
छबी तुझी 
भासवू लागलो
तू 
जुनी जुनीशी
आठवू लागलो

- प्रसाद साळुंखे