वासूनाका आवडल्यामुळे, अधाशासारखं राडा वाचलं. यातलं कथानक मस्त आहे, आणि भाऊ पाध्यांच्या लेखनशैलीच्या चरचरीत फोडणीमुळे कादंबरीची लज्जत अजून वाढली आहे. बदलत्या महानगराचा एका पिढीवर होणारा परिणाम, राडेबाजी मध्ये मिसळत चाललेला फोलपणा, होतकरू तरुणांची वाढती व्यसनाधीनता या साऱ्यावर हे पुस्तक भाष्य करते.
शिवसेनेच्या काही नेत्यांचा या पुस्तकात उघड नामोल्लेख आहे त्यामुळे या पुस्तकावरून एकेकाळी शिवसेनेने बराच राडा घातल्याचं कळतं. राजकीय पक्षाच्या सोयीस्कर मराठी कार्ड खेळायच्या भूमिकेतला फोलपणा या कादंबरीत अधोरेखित केला आहे, जे त्याकाळी अधिक चिथावणी देणारं ठरलं, म्हणून हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतरही दुकानांमधून गायब होतं.
राड्याची परिमाणं बदलली तरी आजही राडा राजकीय खेळीचा भाग आहे, राड्यात परिमाणापेक्षा परिणामांना अधिक महत्त्व असतं.
ही कथा आहे मंदार अण्णेगिरीची. बड्या उद्योगपतीचा बिगडा बेटा. पथभ्रष्ट, धीट, शीघ्रकोपी राडा करण्यात पटाईत पण मायेचा भुकेला. लोकल गुंडांपासून, शिवसेना शाखाप्रमुख वगैरे कोणालाही न जुमानणारा. स्वत:च्या वडिलांवर, त्यांच्या इभ्रतीवर जणू काही सूड उगवायचा आहे असे मंदारचे एकेक कारनामे. न्याय्य, अन्याय्य सारं मंदार ठरवतो, यात गल्लत करत एखाद्या मुलीला भर रस्त्यात अडवणं, शिवी घालणं, दारू पिऊन मारामाऱ्या करणं सारं त्याच्या दृष्टीने न्याय्यही ठरतं. संवेदनशीलतेची एक पुसट छटा आहे त्याच्या स्वभावाला पण स्वभावाच्या इतर पैलूंचा भडकपणाच जास्त असल्यामुळे ही पुसट छटा दुर्लक्षिली जाते. नायकाची ही बंडखोरी काय काय वळणं घेते, शिवसेना त्याच्या श्रीमुखात लगावून तडफदार बाणा दाखवते का बड्या उद्योगपतीचा लेक म्हणून त्यातून सवलत असते? आणि शेवटी सुबह का भूला परत घरी जातो का? हे सगळं कळण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा.
- प्रसाद साळुंखे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा