नमस्कार दोस्तांनो,

चुरापाव वाचण्याआधी चुरापावविषयी थोडं सांगतो. चुरापावची तोंडओळख म्हणा हवं तर. बर्‍याच जणांना चुरापाव माहितदेखील असेल, कधीनाकधी त्याची तोंडओळख (शब्दशः तोंडओळख) झालीही असेल कदाचित. तुम्ही नाक्यानाक्यावर वडापावच्या गाड्या पाहिल्या असतील. त्याच वडापावची चटणीपाव आणि चुरापाव ही धाकटी उपेक्षित भावंडं म्हणूयात. म्हणजे पहा ना वडापाव आता गाडीवरुन, मॉलमधून, फाईव्हस्टार रेस्टॉरेंटपर्यंत गेला. आता तर बर्‍याच राजकीय पक्षांशी त्याची सलगी ऐकीवात येतेय, पण इतकं असूनही चुरापाव आणि चटणीपाव उपेक्षितच. लोकांना चटणीपावचं नाव तरी माहित असतं, तर दुसरीकडे चुरापाव जवळजवळ नामशेष होण्यातच जमा आहे.

तसा हा चुरापाव वडापावइतका चविष्ट नाही, पोटभर नाही, नुसताच एक हलकाफुलका टंगळमंगळ पदार्थ. चुरापाव हा एक विचार आहे एक 'easy going attitude'. मी साहित्यातला जाणकार नव्हे, साहित्याला वेगळीच उंची वगैरे देण्याचा विचार ब्लॉग सुरु करण्यामागे नाही. हा ब्लॉग खरंतर माझ्यासारख्या चुरापाव लोकांसाठी ज्यांना केवळ वाचायचंय बघायचंय आणि सोडून द्यायचंय. माझी चुरापावविचारसरणी कोणाला आवडो न आवडो वडे तळायला सुरुवात झालीय ...

पुन्हा भेटूच ...

शनिवार, २७ जून, २००९

कसे सांगू पावसाला?

कसे सांगू पावसाला?
वर छप्पर गळके
घर असे हे पडके
जणू घर नाही आता आहे ओले हे थडगे
घरी असा एकटा मी
म्हातारा कुचकामी
पुत्रदर्शन दुर्मिळ
सणावारी कधीकाळी तो दारी या धडके
कसे सांगू पावसाला?
वर छप्पर गळके

चार पैसे धाडी मला
ठेवाया नोकरगडी घरा
दोन बोटे पत्र नाही
बाळा संपली का शाई?
असे कसे मन ह्याचे झाले कठोर कोडगे
कसे सांगू पावसाला?
वर छप्पर गळके

लोक हसती मला
उगाच उपहास
हा औषधांचा मारा
पथ्य आणि उपवास
वर अंगावर नाही धुपे सुके फडके
कसे सांगू पावसाला?
वर छप्पर गळके

आता येऊ दे पूर
संपू दे किरकिर
कुणी मारेल खांदा
कुणी धरेल मडके
कसे सांगू पावसाला?
वर छप्पर गळके

-प्रसाद 

शुक्रवार, २६ जून, २००९

भ्रमणध्वनी

माणसाच्या मूलभूत गरजा कोणत्या? अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि मोबाईल. होय मोबाईलसुद्धा. नाही ही अतिशयोक्ती नाही. मोबाईल हा जणू प्राणवायूच बनत चालला आहे. मोबाईल ही काळाची गरज आहे, प्रवासात सोईचा आहे मान्य. पण बर्‍याचदा लोकांना मोबाईलचा वापर कसा करावा हेच कळत नाही. उदाहरणार्थ, जर शेजारी बसलेल्या माणसाला सतत कॉल्स येत असतील तर काहींचा स्वतःच्या मोबाईलशी चाळा सुरु होतो. अशा वेळेला नुसते वरवर रिंगटोन्स चाळून यांना कोण समाधान मिळतं देव जाणे. बर कपाळावरच्या आठीने यांच्या निर्विकार चेहर्‍यावरची माशीदेखील हलत नाही. फोनवर बोलतांना नेमकी आवाजाची पातळी काय असावी याची बर्‍याचजणांना जाणीव नसते. आपला आवाज आपल्या फोनच्या रिंगटोनपेक्षा तिपटीने मोठा असावा असा त्यांचा जणू नियमच असतो.

मागे एकदा एका मित्राबरोबर मी एका रेस्टॉरेंटमध्ये गेलो होतो. बार कम रेस्टॉरेंट होतं, पण रेस्टॉरेंट कम बार वाटत होतं. सहाजिकच हिरवळ नव्हती सोमरसाचे दरवळ मात्र होते. रापलेल्या चेहर्‍याची खप्पड माणसं, त्यांच्या समोर भरलेले ग्लास आणि खाद्य. एक गुजराथी शेटजी पाकीट घरी विसरल्यासारखा चेहरा करुन एकटेच पापलेट फ्राय चिवडत बसले होते. कुठे आगरी बांधवांच्या तोंडावर सरस्वती नाचत होती. एकटे वेटर सोडले तर कोणीही त्या रेस्टॉरेंटच्या इंटेरिअरला साजेसा वाटत नव्हता. नाना तर्‍हेची माणसं होती, आता माणसं होती म्हणजे मोबाईलच अस्तित्व जाणवल्याखेरीज थोडीच राहणार. एक तळीराम बर्‍यापैकी जमिनीपासून फूट-दिडफूट वर अधांतरी तरंगत होते. वेटरची भांडून झालेल्या या तळीरामांना बहुतेक आमचं आणखी मनोरंजन करायचं होतं. "हॅलोऽऽऽ" सगळ्यांना ऐकू जाईल इतक्या मोठ्यांदा ते बोलत होते, आणि कहर म्हणजे मोबाईल लाऊडस्पीकर मोडवर होता. "नॅऽऽऽय नो ... ऍक ..ऍकोन घे माआ लेत होयेल .. तू झोप.." "पुरे करा आता" एक थंड संवेदनाहीन आवाज, काही रोजच्या ऐकण्यातले आवाज असतात, जसा दार बंद केल्याचा "खट्ट" आवाज, किंवा चहाच्या कपावरचा चहाचा ओघळ टेबलावर सांडू नये म्हणून कप किंचीत बशीला घासून उचलतानाचा आवाज, असाच आणखी एक रुळलेला, थंड .. निर्जीव आवाज ऐकल्यासारखं वाटलं. "जास्त नाय ... बाबू झोप तू .. झोऽऽ हां .." "या बघू आधी थांबवा आता, टॅक्सी करा रात्र ..." "अरेऽऽ कॅ लहान हाय काय? .. झोप ना गप... साली ... कॅ .. ए कॅ ..कॅ बघतो तू ?" माझ्या डोक्यात साली शब्द घुमत होता. तळीरामांचं एव्हाना उरकलं आणि त्यांच विमान हेलकावे खात निघालं. फोन नंतरही बराच वेळ वाजत होता पण त्याच्या लेखी तो सायलेंट होता. थोड्यावेळाने त्याने आठ्या पाडत, भुवया ताणून अंदाज घेत फोन उचलला, पुन्हा मघाचचाच थंड आवाज. इतक्या थंड या कशा काय राहू शकतात. सहनशीलता, सोशिकतेचा कहर होती साली.

मला स्वतःला गाणी ऐकायला फार आवडतं. मी लोकसंगीत, भावगीत, नाट्यसंगीत, चित्रपटगीत अशा कुठल्याही प्रकारच्या गाण्यांचा आस्वाद घेऊ शकतो , पण कुठल्याही वेळेला मात्र नक्कीच नाही. विशेषतः जेव्हा बॉसने मला फैलावर घेतलेलं असतं. म्हणजे त्याचं होतं असं की बॉस माझ्या IQ पासून COMMONSENSE पर्यंत सगळ्याचं दुकान चव्हाट्यावर मांडतो. मी हे सगळं सहन करून राग गिळून कसाबसा बसमध्ये बसतो, आणि माझ्या बाजूचा इसम नेमका 'पहेले तो कभी कभी गम था' बसला ऐकू जाईल अशा आवाजात लावतो. अरे राजा तुला अल्ताफ राजाची भक्ती करायचीय तर खुशाल हेडफोन लावून कर की, आणि हेडफोन घ्यायचेच जर वांधे असतील तर मोबाईल तरी वापरत जाऊ नकोस. यांना काय बोलावं हेच कळत नाही, एकदा तर छशिट पासून वडाळ्यापर्यंत एका दर्दीने 'सात समंदर पार मे तेरे' हे गाण एक सात आठ वेळा तरी लावलं, पुढे पुढे तर पुढचं कडवं मलाच म्हणावसं वाटत होतं की "ओ जुल्मी मेरी जान तेरे कदमोंके नीचे आ गई" , कधी कधी प्रश्न पडतो की यांना ही गाणी खरच आवडतात की लोकांचा अंत पाहण्यासाठी ही असली गाणी लावतात? एकदा एकानं असचं तार स्वरात गाणं लावलं होतं, मी कधीचं ठरवलेलं की असा कोणी भेटला की त्याला झाडायचा. माझ्यातला angry young man जागा होत होता. "बॉस हेडफोनपे सुनोगे तो अच्छा होगा" असं म्हटलं अगदी शांतपणे. पण वारंवार सांगून त्यानं ऐकलं नाही. उलटपक्षी "तेरेको क्या प्रोब्लेम है?" असं आठ्या पाडून विचारलं मला. शाब्बास म्हणजे त्रास होतोय सगळ्यांना आणि याचा चेहरा असा की जणू त्याला लाखभर रुपयांचं मी देणं लागतो. लोक पूर्वी वैतागले की इंग्रजी झाडायचे, आता मराठीत पेटतात, thanks to Raj, "प्रॉब्लेम म्हणजे स्वतःचं बघितलं म्हणजे झालं, तुझी enjoyment होतेय रे पण इतरांना त्याचा त्रास होतोय त्याचं काय?" त्यानं निमूट गाणं बंद करून मोबाईल खिशात घातला. अख्खी बस माझ्याकडे बघत होती. म्हणजे नेहमी कोणी आवाज चढवल्यावर होतं तसच काहींचा मूक पाठींबा, काहींचे आगाऊ आहे कार्ट लुक्स, काही निव्वळ बघे शी काय यार आता आता कुठे मजा यायला लागली होती हे अजून चालायला हवं होतं निदान माझा स्टॉप येईपर्यंत असं म्हणणारे, काही फक्त समंजस प्रवासी जणू काही झालच नाही अस भासवणारे. मोबाईलचा त्रास कमी म्हणूनकी काय खोब्रागडेंनी बसमध्ये दूरदर्शन बसवलेत त्या दूरदर्शनच्या टुकार जाहिरातींमुळे हल्ली मला बस लागण्याची भीती वाटते.

माझी एक मैत्रिण तर मोबाईललाच चिकटलेली असते. अगदी घरातून निघाल्यापासून ते पुन्हा घरी पोहोचेपर्यंत तिच्या प्रियकराला सगळी माहीती पुरवत असते. म्हणजे ट्रेन मिळाली, बस पकडतेय, कॅन्टिनात चहा झाला, लेक्चर ऑफ आहे, वही विसरले, भूक लागली, सरांनी झापलं, पाऊस पडतोय, मित्र केक कापतोय, कावळा उडाला, कुत्रा भुंकला, च्युइंगम थुंकला, पेपर्स मिळाले, नखं कुरतडली, चप्पल लागली, भांडणं झाली, ती अशी बोलली, तो शहाणा आहे, पाणी साचलं, आईशी वाजलं, अय्या गंमत सांगायचीय राहिली, मी फोन ठेवतेय आता. असं अनाकलनीय, अवर्णनीय वगैरे काहीतरी चालू असतं. बरं फोन चालू असतांना एकीकडे आमच्याशीही बोलत असते. कसं काय जमत यांना बुवा आम्ही तर अजून लॅंडलाईनलाही तितकेसे रुळलो नाही. "हलाव कोन मंगता हय रे? नाय नाय येधर नाही रयताय? नंबर जरा देख के घुमाव ना" असे संवाद आता आता पर्यंत आमच्या तोंडी दिसत असत. नाही म्हणायला कधी कधी ही मैत्रिण काहीतरी 'महत्त्वाचं' मुलींच्या भाषेत 'तसलं' बोलायला रेंज नाही अस दाखवून एकटी थोडी दूर जाते. असं झालं की आम्ही तिची जाम खेचतो, संवादही ही आमचेच, कलाकारही आमचेच आणि दादही आम्हीच देतो. तिने जर हा ब्लॉग वाचला तर माझी काही खैर नाही, हा तिच्या प्रियकराची काही मिनिटांसाठी सुटका केल्याचं पुण्य मात्र नक्कीच पदरात पडेल.

माझा मोबाईल साधासा, जवळजवळ लॅंडलाईन. ना बिचारा गाणी गुणगुणत, ना रेडिओ लावत, ना फोटो काढत, ना शूटिंग करत, नाही म्हणायला साप आहे त्यात खेळायला. मित्रांना वाटतं माझा मोबाईल माझ्यासारखाच आहे म्युझियममध्ये ठेवायच्या लायकीचा. मीही ऐकून ऐकून घेतलं आणि सांगितलं त्यांना की एकदा चांगल्या पगाराची नोकरी मिळूदेत असा फोन घेईन ज्याला सरकता येईन पुढेमागे (slice का काय ते तसलं), ज्याची मानगुट पिळता येईल, ज्याला वहीसारखं उघडता येईल, जो मोठ्यांदा गळे फाडेल, तुमच्या लग्नाचे फोटो, विडिओ शूट, एवढच काय नाचायला लाऊडस्पीकर, हॅलोजनसुद्धा तो एकटाच बनेल, फंक्शन्स तर त्याचे एवढे असतील की जर वाजलाच चुकून तर पाच-सात मिनीटं मलाच समजणार नाही की तो उचलायचा कसा? आत्ता बोला

आरती अंतिम टप्प्यात असतांना घालीन लोटांगणला कोणाची कोंबडी पळावी, काव्य संमेलनात कोणाचा नगारा वाजावा, इतकच काय लेक्चर्स चालू असतांना कुणाचं खट्याळ बाळ हसावं, नाटक ऐन रंगात असतांना यांना रेतिवाला हवा व्हावा, कोणाच्या अंत्यविधीला तुतारी वाजावी, मुलगी बघायला जाताना काही ठरण्याअगोदर 'हाताला धरलया' म्हणत फोननं भावनाविवश व्हावं हे आणि असे अनेक किस्से आहेत एकट्या मोबाईलचे, ... आलोच वाजला बहुतेक ...

मंगळवार, २३ जून, २००९

दोन गुणिले बारा तास उसंत

दोन जांभया दिल्या
दोन तांब्या आंघोळ केली
दोन हात जोडले
दोन बिस्कीटे, चहा, पोहे रिचवले
दोन हाका आल्या
दोन डाव क्रिकेटचे टाकले
दोन रुपये बॉलला कॉन्ट्रीब्युशन

दोन स्टंपात भागले
दोन ओव्हर्स कुटल्या
दोन बॅटस विटल्या
दोन खेळाडू कुचकामी
दोन पडल्या धावा कमी
दोन सिगारेटचे मारले दम
दोन मागवल्या पानी कम
दोन थेंब त्यातलाच शर्टवर सांडला
दोन रुपयांचा सर्फ आणला
दोन चिमट्यांनी शर्ट वाळवला
दोन बसले कावळे शर्टवर
दोन दगड भिरकावले
दोन तुकड्यात काच फुटली
दोन शेजारी धावत आले
दोन सणसणीत हासडल्या
दोन झणझणीत परतवल्या
दोन काचा लावून दिल्या
दोन पदरच्या नोटा गेल्या
दोन कावळे पुन्हा दिसले
दोन उभ्या आठ्या पडल्या
दोन जहाल कटाक्ष टाकले
दोन कावकाव प्रतिसाद आले
दोन बायकोचे मिस्डकॉल्स आले
दोन वस्तू आणायला सांगितल्या
दोन चाकाची बाईक काढली
दोन गाड्यांमध्ये पार्क केली
दोन इसमांनी ती उचलली
दोन जणांना अडवले
दोन कबूल केले
दोन पदरच्या पुन्हा गेल्या
दोन लीटर दूध विसरलो
दोन मिनीटात आणून टाकले
दोन वाजता जेवलो

दोन क्षण पडलो
दोन कार्ट्यांनी उच्छाद मांडला
दोन दिले शिव्याशाप
दोन डोळे उघडले श्या!! नाईल्लाज
दोन हाका बायकोला दिल्या
दोन मिनीटात चहा आला
दोन घोटात तो गिळला
दोन-चार पेपराची पाने चाळली
दोन-एक तास टि.व्ही पाहिला
दोन घास जेवलो
दोन दिवसांची सुट्टी संपल्याचे
दोन अस्पष्ट हुंदके दिले


-प्रसाद 

गुरुवार, ११ जून, २००९

नास्तिक

मागे एकदा डोंबिवलीत 'आयुष्यावर बोलू काही' या श्री. संदिप खरे, आणि डॉ. सलील कुलकर्णी यांच्या कार्यक्रमाला जाण्याचा योग आला होता, तेव्हा संदिप खरेंनी सादर केलेली 'नास्तिक' ही कविता मला विशेष भावली. तसं बघायला गेलं तर त्यांच्या सगळ्याच कविता मला आवडतात, पण 'नास्तिक' माझी सगळ्यात आवडती. मला सुचतच नव्हतं काही त्या दिवशी, वाटत होतं ती कविताच ऐकत रहावी, काही केल्या कामात लक्ष लागेना. मग याहू वर चॅट करता करता हे चित्र रेखाटलं, फायदा विशेष झाला नाही, अस्वस्थता कायम राहिली ...

बुधवार, १० जून, २००९

खेळ मांडियेला

निळी शाई कोरा कागद, आम्ही कोणाला भीत नाही
एवढं म्हणण्याइतकेसुद्धा, आम्ही साले धीट नाही

रंगात रंग कोणता? खेळू लागले सारेजण
ताठ मानेनं फडफडणारी, एकरंगी फीत नाही

लपंडावात कसे सारे एकजात पारंगत
पिढ्यानपिढ्या खेळूनदेखील, खेळाचा त्या वीट नाही

सोनसाखळीने बघताबघता घेराव की हो घातला
जनता बापडी यात, चारी मुंड्या चित राही

कांदाफोडी तर पठ्ठे असे काही खेळतात
जणू कुठल्याच पक्षाशी, आता उरली प्रीत नाही

सिनेमावाले मांड्या थोपटीत हुतुतूत आले
तशी सिनेमावाल्यांना पाडायची, आपल्याकडे रीत नाही

खेळाचे नियम पाळा की राव
खेळाचं मैदान आहे, तुमचं पिलभीत नाही

लाईचना खात बसले, आम्हाला साधी ट्रीट नाही
जा काका आता, तुमालाबी सीट नाही

सामान्यांना राजकारणात वाव नाही
कारण दुधात पीठ मिसळायची, त्यांच्याकडे ट्रीक नाही



-प्रसाद 

साधी माणसं

राजकारण हा माझा प्रांत नव्हे असं सगळेच म्हणतात. पण काहीजणांनी साळसूदपणाचा उसना आव आणून असं काही म्हटलं की यांना अजून तिकीट कसं मिळालं नाही याचं आश्चर्य वाटतं. आपल्या आजूबाजूला अशी बरीच संधीसाधू मंडळी असतात. डोळ्यासमोर येणारा प्रत्येक नवा चेहरा यांचा नवा मदतनीस असतो. बरेचदा यांची साधी तोंडओळख यांच्या गरजेनुसार मैत्रीत बदलते. बघावं तेव्हा साखर पेरतांना दिसतात. यांच कुठल्याच गोष्टीवर ठाम मत नसतं आणि कोणाशी मतभेदही नसतात. हे कुठल्याच गोष्टीचा निषेध करीत नाहीत, बंड पुकारीत नाहीत. शांत राहून आपण किती आदर्शवत (?) आहोत हे दाखवतात. म्हणजे म्हणाल तर तटस्थ भूमिका म्हणाल तर मूक पाठिंबा. यांची मस्केबाजी मैत्री, आदर, संस्कार यांच्या वेष्टनात इतक्या बेमालूमपणे गुंडाळलेली असते की आपल्याला गुंडाळलं जातय याची शंकाच कुणाला येणार नाही. कुठल्याच गोष्टीची सरळ, मुद्देसूद चर्चा यांना मान्य नसते. त्यामुळे सगळ्या गोष्टींचा गुंता तयार होतो. सगळे धागेदोरे माहित असूनही जाणीवपूर्वक गुंता सोडवला जात नाही. 'गुंतूनी गुंत्यात सार्‍या पाय यांचा मोकळा' असतो. यांचं आयुष्य म्हणजे योजनांची निव्वळ आखणी असते. यांच्यासाठी माणसं म्हणजे पायर्‍या ... दगडाच्या .... भावनाहीन, संवेदनाहीन. हे आपल्यासारखेच इतरांना समजतात. सगळी माणसे देवाने एकाच साच्यातून काढलीत असं यांच ठाम मत असतं. आपल्या संकुचित विचारांचा यांना अभिमान वाटतो, इतकच नव्हे तर सगळ्यांचे विचार असे असावेत असा त्यांचा अट्टाहास असतो. यांची यशाची व्याख्या म्हणजे साखर पेरण्यातील चातुर्य आणि त्या जीवावर मारलेल्या उड्या. अशी माणसं बघितल्यावर पटतं की आयुष्यात शिकण्यासारखं खूप आहे.

रविवार, ७ जून, २००९

धूळ ...

अशी सरली वर्षे जसा उडावा कापूर ...
फडफडली काही पाने झटकली धूळ ...

आज सुका चाफा तरारला पुरेपूर
सुरुवात होते अशी नष्ट म्हणता समूळ

हा रुमाल फुलांचा नेतो तिथे दूर
ते भातुकलीचे घर .. शेंगदाणा थोडा गूळ

काही लिहायचे मीही, थोडे छेडायचे सूर
तेव्हा भरायचा ऊर .. आता वाटे सारे खूळ

होता नजरेत माझ्याही नव्या आशांचा पूर
आता उरले फक्त हे डबके गढूळ ...

केव्हा? कधी ? कसा? सारा पालटला नूर
दृष्ट लागली अशी की झाले आयुष्य मचूळ ...

तुझ्यामाझ्यामध्ये होता भकास तो धूर,
भरधाव सुटली ती ... मागे डायरीची धूळ . . .

-प्रसाद